दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर :
कें.प्रा.शा.चांदई एक्को केंद्रा अंतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन प्रा.शा. चांदई ठोंबरी येथे करण्यात आले होते. केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे उद्घाटन केंद्रप्रमुख आण्णा इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण परिषदेमधील मार्गदर्शन करताना आण्णा इंगळे यांनी सांगितले कि सर्व प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे ही शिक्षकांची सर्वोच्च प्राथमिकता आहे.राज्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रमाची घोषणा शासनाने ५ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. निपुण कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांमध्ये संख्या ज्ञान वाढविणे गरजेचे असल्याचे शिक्षण परिषदेत बोलतांना शिक्षकांना सांगितले.
या अभियानाची आपल्या केंद्रात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षिका यांची कार्यशाळा घेण्यात आली.
सर्व शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सदर कृती कार्यक्रम राबविला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला नाही. त्या विद्याथ्यांच्या नोंदी संकेतस्थळावर शिक्षकांना कराव्या लागणार आहेत. यात दि. २० मार्च, ५ एप्रिल, २० एप्रिल, ५ मे, २० मे, १५ जून आणि ३० जून २०२५ या दिवशी वर्ग शाळांची आकडेवारी संकलित करण्यात येणार आहेत.
१५ दिवसांनंतर चावडी वाचन कार्यक्रम
या कृती कार्यक्रमाच्या कालावधीत दर १५ दिवसांनी गाव पातळीवर चावडी वाचन व गणन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, राज्यस्तरावरून नेमून दिलेल्या तारखांना सदर चावडी वाचन व गणन उपक्रम आयोजित करण्यात येईल. यात गावातील नागरिक पालक यांना आमंत्रित करण्यात येणार असून, सदर कार्यक्रमाचे आयोजन दि. ३० मार्च २०२५ नंतर करण्यात येणार आहे. १ मे २०२५ च्या ग्रामसभेमध्ये ही चावडी वाचन व गणन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
या कालावधीत या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्या शाळा शिक्षक दिलेल्या कालावधीत अपेक्षित उद्दिष्टे साध्य करणार नाहीत, अशा शिक्षकांकडे विशेष प्रशासकीय व अध्ययनात्मक लक्ष देण्यात येईल.या शिक्षण परिषदेमध्ये सतीश आंबरे व प्रवीण पवार यांनी केंद्रातील सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.या शिक्षण परिषदेला केंद्रीय मुख्याध्यापक प्रल्हाद पालोदे, माधव गंदपवाड व केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.
